गंगापूरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला गती द्या, कालबद्ध पद्धतीने योजना पूर्ण करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
गंगापूरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला गती द्या;
कालबद्ध पद्धतीने योजना पूर्ण करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
मुंबई, दि.19(डि-24 न्यूज)- गंगापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरालगतच्या नव्याने समाविष्ट झालेल्या परिसराची गरज लक्षात घेता गंगापूर नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला तातडीने गती देण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
गंगापूर नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार सतीश चव्हाण, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त संजय काकडे, गंगापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष अमोल जगताप, पाणीपुरवठा सभापती सोपान देशमुख, नगरसेवक संतोष आंबीलवाडे, मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, गंगापूर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 50 हजारांपर्यंत पोहोचली आहे. तसेच आंबेवाडी आणि शहर परिसरातील इतर भागांचा समावेश झाल्याने सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजनेची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे.
योजनेच्या मार्गातील प्रशासकीय तसेच तांत्रिक त्रुटींची पूर्तता संबंधित विभागांनी निश्चित कालमर्यादेत करावी. आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन योजनेचे काम वॉर फुटिंगवर हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
गंगापूर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन योजनेचे नियोजन व अंमलबजावणी दर्जेदार पद्धतीने करावी आणि कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
What's Your Reaction?