मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर व एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल एका कार्यक्रमात व्यासपीठावर साथ साथ...!

 0
मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर व एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल एका कार्यक्रमात व्यासपीठावर साथ साथ...!

रथातून विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन; मनपा शाळांचा प्रवेशोत्सव उत्साहात...

मंत्री अतुल सावे यांनी जाहीर केली 50 लाखाची मदत...

काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे नारेगाव येथील कार्यालय व घर सत्ताधारी पक्षाने पाडले आणि आज नारेगाव येथील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात सत्ताधारी व मतीन पटेल एकाच व्यासपीठावर उपस्थित होते...

छत्रपती संभाजीनगर, दि.16(डि-24 न्यूज)- महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, नारेगाव (मराठी व उर्दू) येथे सन 2026-27 शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शहरस्तरीय शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे सजविलेल्या रथातून शाळेत आगमन झाल्याने कार्यक्रमाला अनोखे स्वरूप प्राप्त झाले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, नगरसेवक मतीन पटेल, गोकुळ मलके, काकासाहेब काकडे, सिद्धार्थ साळवे, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाड, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे यांच्यासह विविध पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नवीन गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

मंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, "पूर्वी विद्यार्थी शाळेत जाताना रडत असत; मात्र आज शाळेत येण्याबाबत त्यांच्यात उत्साह आहे. पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके आणि विविध सुविधा मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे." त्यांनी शाळेच्या मैदानाच्या विकासासाठी आमदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच 'अन्नामृत' योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक व सात्त्विक भोजन उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले.

महापौर समीर राजूरकर यांनी शाळेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल तसेच संरक्षण भिंतीचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

पालकांना संबोधित करताना त्यांनी मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी, कचरा न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आणि चांगला नागरिक बनण्याचे संस्कार रुजविण्याचे आवाहन केले. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आयुक्त येडगे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले. "एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. पहिलीपासून दहावीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागण्यासाठी प्रयत्न करावेत. दहावीनंतरही विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून त्यांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन करावे," असे ते म्हणाले.

सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेतील मूलभूत सुविधांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. 

मनपा केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा मापारी यांनी प्रास्ताविक केले. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर शेख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील व फेरोजखान पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, बालताई, सेवक तसेच पालकांनी सक्रिय सहभाग

नोंदविला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow