घरापासून राष्ट्रनिर्मितीची सुरुवात, कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्याचा देवगिरी नागरी बँकेतून संदेश
घरापासून राष्ट्रनिर्मितीची सुरुवात; कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्याचा देवगिरी नागरी सहकारी बँकेतून संदेश
छत्रपती संभाजीनगर, दि.15 (डि-24 न्यूज) 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवगिरी नागरी सहकारी बँकेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक व बँकेचे सन्माननीय ग्राहक प्रतिक चंडालिया उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी ‘कुटुंब प्रबोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंबातील संवाद, एकत्रितपणा आणि संस्कार यांचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमधून कुटुंब व्यवस्था अधिक मजबूत करता येते, असे सांगितले.
«“घरात आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवणे, कुटुंबाने एकत्र जेवण करणे, एकत्र फिरायला जाणे आणि वर्षातून एखादी कौटुंबिक सहल आयोजित करणे अशा छोट्या गोष्टींमधून कुटुंबातील संवाद आणि आपुलकी वाढते. त्यातूनच पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतात.” — प्रवीण नांदेडकर»
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले की, कुटुंब आणि देश हे राष्ट्रनिर्मितीच्या साखळीतील महत्त्वाचे दुवे आहेत. देशाचे भवितव्य घडविणारी युवा पिढी चांगल्या कुटुंबातून आणि संस्कारातून तयार होते. त्यामुळे राष्ट्रनिर्मितीची सुरुवात ही आपल्या घरापासूनच झाली पाहिजे.
«“देश घडवायचा असेल आणि देशाला पुढे न्यायचे असेल, तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून होते. मुलांवर कुटुंब, समाज आणि देशाविषयी प्रेम व जबाबदारीचे संस्कार झाले, तर उद्याची पिढी राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी घडेल. त्यामुळे कुटुंब व्यवस्था सुदृढ करणे ही काळाची गरज आहे.” — किशोर शितोळे»
मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहणे, कुटुंबीयांनी एकत्र वेळ घालवणे, संवाद साधणे आणि मुलांसोबत दर्जेदार वेळ देणे या बाबींचे महत्त्वही शितोळे यांनी अधोरेखित केले. मजबूत कुटुंबातून सुसंस्कृत समाज आणि सुसंस्कृत समाजातून सक्षम राष्ट्र घडते, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात देवगिरी नागरी सहकारी बँकेचे माजी संचालक जयंत भेंगर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेच्या संचालिका जयश्री ताई किवळीकर, प्रज्ञा ताई तल्लार, संचालक सुरेश जगाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेंद्र कोयाळकर, श्रीदत्ता शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारीवृंद व मान्यवर उपस्थित होते.
80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून कुटुंबातील संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मिती यांचा परस्परसंबं
ध अधोरेखित झाला.
What's Your Reaction?