वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या विरोधात हायकोर्टात दाखल याचिका फेटाळली...
संगीन मस्जिद वक्फ जमीन प्रकरणात समीर काझी यांच्याविरुद्ध दाखल याचिका हायकोर्टाने फेटाळली...
हायकोर्टाने याचिकाकर्त्यालाच फटकारले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)-बीड जिल्ह्यातील संगीन मस्जिद वक्फ जमिनी प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात येत आहे. काझी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र सदरील याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. त्याच बरोबर कसल्याही प्रकारचे पुरावे नसताना जाणीवपूर्वक न्यायालयाचा वेळ वाया घालवल्या प्रकरणी हायकोर्टाने याचिका कर्त्यालाच फटकारले.
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र समीर काझी यांची महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोकांकडून केला जात आहे. अंबाजोगाई येथील संगीन मज्जिद अंतर्गत वक्फ बोर्डाची जमीन बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी बळकावली असा कथित आरोप करत काहींनी समीर काझी यांना टार्गेट केले होते. याच प्रकरणात समीर काझी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी हायकोर्टाने सदरील याचिका फेटाळून लावली. समीर काझी यांच्याकडे वक्फ बोर्डाची जमीन नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर याचिकाकर्त्याने जाणीवपूर्वक वैयक्तिक द्वेषातून कसल्याही प्रकारचे पुरावे नसताना याचीका दाखल करून न्यायालयाचा आणि संबंधित यंत्रणेचा वेळ वाया घालवला म्हणून हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. समीर काझी यांच्यावतीने ॲड. सय्यद तौसिफ आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने समीर काझी यांच्यावर कथित आरोप करून त्यांची राज्यभर बदनामी करणाऱ्यांना हायकोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दणका बसला आहे.
ज्यांनी ज्यांनी बदनामी केली त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार - समीर काझी
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या माध्यमातून अतिशय सुटसुटीत आणि पारदर्शी कारभारावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत झाला नाही एवढा अमुलाग्र आणि अत्याधुनिक बदल महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या कारभारात झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक कामात गतिमानता आलेली आहे. राज्य वक्फ बोर्डाची प्रगती पाहता काही विघ्नसंतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक मला लक्ष्य करून राज्यभर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता. कसल्याही प्रकारचा संबंध नसतानाही माझे नाव विनाकारण संगीन मस्जिद प्रकरणाशी जोडून माझी आणि राज्य वक्फ बोर्डाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे याचिकाकर्ते आणि आरोप करणारे तोंडघशी पडले आहेत. संगीन मस्जिद प्रकरणावरून ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली त्यांच्याविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?