दुष्काळ परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

 0
दुष्काळ परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना

तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

नागपूर दि.12(डि-24 न्यूज)-: दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या राज्यातील 18 जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन तात्काळ उपाययोजना करता याव्या यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी  जिल्ह्यातील पिकांच्या झालेल्या नुकसानीसह उद्धवलेल्या परिस्थितीबाबत मुद्देसूद व सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीस खासदार माया इवनाते, सर्वश्री आमदार प्रवीण दटके, मोहन मते, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, डॉ.राजीव पोतदार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त विपीन इटनकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये

अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या 18 जिल्ह्यांचा समावेश आहे.

मराठवाडा विभागात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि मूग, विदर्भात कापूस, मूग, उडीद, तूर तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत संत्र्याचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच ऊस कारखाने लवकर सुरू झाल्यास गळीत हंगाम कमी कालावधीचा राहील, ज्यामुळे चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवड कमी होण्याचा अंदाज असून दुष्काळाबाबत नोंदवण्यात आलेली महत्त्वाची निरीक्षणे पालकमंत्र्यांनी यावेळी 

जिल्हाधिकाऱ्यांसमोर नोंदवली.

या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करता यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सद्य स्थितीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करावा. प्राप्त अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील. या जिल्ह्यांतील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने या परिस्थितीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवल्या जातील असे श्री बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow