विभागीय आयुक्तांनी घेतला शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा...

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि. 16(डि-24 न्यूज) विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी विहित कालावधी ठरवून देण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये काम विहित कालमर्यादेतच पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगर पालिका प्रशासन सहआयुक्त देवीदास टेकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, मनपाचे श्री.काझी, नगर प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संजय केदार, राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले, कारागृह अधीक्षक निमगडे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री.पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहिर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, 55 पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र फारोळा, ॲप्रोच ब्रिज यासह पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक कामाला कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच कंत्राटदाराला आवश्यक यंत्रसामुग्री व मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
26 एमएलडी जलशुदधीकरण केंद्र फारोळा येथील कामे 28 जुलै पर्यंत पूर्ण करून 1 ऑगस्ट पासून येथून 26 एमएलडी पाणीपुरवठा सुरु करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






