मिक्स कचरा देणा-या नागरीकांना आता बसणार दंड

 0
मिक्स कचरा देणा-या नागरीकांना आता बसणार दंड

मिक्स कचरा देणाऱ्या नागरिकांना आता बसणार दंड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :दि.24 घरोघरी जावून नागरिकांच्या घरात जमा कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीला कंत्राट दिलेले आहे. नागरिकांनी ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून, घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे देणे अपेक्षित आहे., मात्र अनेकदा आवाहन करूनही मिक्स कचरा देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे., त्यामुळे अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे., अशी माहिती घनकचरा व्यवस्थापक विभागप्रमुख विजय पाटील यांनी दिली आहे. 

महापालिकेने कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. महापालिकेच्या वतीने तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांकडूनही वारंवार याबाबत नागरिकांना आवाहन केले जात आहे. मात्र अनेक भागातील नागरिकांकडून या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या कचरा डेपोवर ओला आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते, मात्र मिक्स कचऱ्यामुळे अनेकदा प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी विविध भागांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला, त्यांना ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरणाबाबत प्रात्याक्षिकही दाखविले होते. तसेच त्यांच्या आदेशाने मनपाच्या पथकाने काही भागात केलेल्या पाहणीदरम्यान, मिक्स कचरा देणाऱ्या नागरिकांना दंडही आकारण्यात आला होता. कारवाई सुरू झाल्याने, मोठा फरक पडला होता. मात्र कारवाया थांबल्यानंतर मिक्स कचरा देण्याची सवय नागरिकांना पुन्हा लागल्याने, दंडात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांकडूनही दंड वसूल करण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे द्यावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow