आदर्श गैरव्यवहार प्रकरणी काही आरोपिविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

आदर्श गैरव्यवहार प्रकरणी काही आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)– आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य आरोपी अंबादास आबाजी मानकापे आणि अनिल अंबादास मानकापे हे अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत.
सन 2016 ते 2022 या कालावधीत संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे आणि संचालक मंडळाने बनावट कर्ज प्रकरणे तयार करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान अंबादास मानकापे यांच्यासह अनेक संचालक, व्यवस्थापक, कर्जदार आणि जामीनदार यांचा सहभाग उघडकीस आला आहे. काही संचालकांनी एकमेकांना जामीनदार दाखवून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. तसेच, काही संचालकांनी स्वतःच्या मालकीच्या संस्थांना बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर करून आर्थिक अपहार केला.
या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप काही आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, न्यायालयीन सुनावणीदरम्यान देविदास आधाने आणि सविता आधाने हे उपस्थित होते, तर इतर काही आरोपी गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शौकत एस. गोरवडे (MPID Act), औरंगाबाद यांनी गैरहजर असलेल्या आरोपी संचालकांविरोधात अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची बचत पतसंस्थेत जमा केली होती. मात्र, या आर्थिक अपहारामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि तपास यंत्रणांनी दोषींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.
What's Your Reaction?






