पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी विनय गौडा
पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे — जिल्हाधिकारी विनय गौडा
पर्यटन विभागाची आढावा बैठक
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2 (डि-24 न्यूज) :- छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नव्याने चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटनस्थळांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसेच शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासन, पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पर्यटन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., सहआयुक्त (महसूल) रिता मेत्रेवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, पोलीस उपायुक्त पंकज अतूलकर, सहायक आयुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, महानगरपालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वविद् अरुण मलिक, पर्यटन क्षेत्रातील हितधारक श्री. राम भोगले, छत्रपती संभाजीनगर प्रमोटर गिल्डचे अध्यक्ष जसवंत सिंग, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष हरप्रीत सिंग यांच्यासह पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक व प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, शाश्वत पर्यटन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व वारसास्थळांसह परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रशासनासोबत टॅक्सी, ऑटो, बसचालक, हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, पर्यटन मार्गदर्शक आणि इतर संबंधित घटकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
तसेच विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निर्देशानुसार, ‘अजिंठा-वेरूळ महोत्सव’ दरवर्षी आयोजित करण्यासंदर्भात यावेळी वेरूळ येथे 'वेरूळ महोत्सव' आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आगामी तीन वर्षांतील महोत्सवांचे वेळापत्रक आतापासूनच निश्चित करण्याचे नियोजन असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी दिली.
बैठकीत पर्यटन संस्था, हॉटेल व्यावसायिक, प्रवास संस्था, सहली आयोजक तसेच इतर भागधारकांनी पर्यटन विकासासाठी विविध सूचना व मते मांडली. पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांनी शासकीय विभाग आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी परस्पर सहकार्य व समन्वय साधून पर्यटनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास, पर्यटनस्थळांची व पर्यटकांच्या सुरक्षेची व्यवस्था, पायाभूत सुविधा, स्वच्छता तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या विविध अडचणी सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ-घृष्णेश्वर परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही आढावा घेण्यात आला.
What's Your Reaction?