किराडपुरा वार्डात मनपाने तोडले 105 नळ कनेक्शन

किराडपुरा वार्डात मनपाने 105 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),
दि.24(डि-24 न्यूज)
शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांमुळे मुख्य जलवाहिनीत दबाव कमी होऊन अनेक भागांत पाणीपुरवठा अपुरा व विस्कळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, आज मोहल्ला किराडपुरा भागात 200 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील 105 अनधिकृत नळ कनेक्शन पोलिस बंदोबस्तात खंडित करण्यात आले.
ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. विशेष पथकाने समन्वयाने आणि ठोस कृती करत ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.
कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी कारवाई करण्यास आदेशित केले, उपअभियंता लक्ष्मीकांत कोतकर, विशेष पथक चे अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता आनंद राजपूत, भूषण देवरे तसेच कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तुषार पोटपिल्लेवार, सागर डीघोळे यांनी सक्रीय सहभाग घेतला.
या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा. पो.नि. घुले मॅडम, पो.उप.नि. खटने, बुरुड, तडवी, वाघमारे व त्यांच्या पथकाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घेतली.
किराडपुरा भागातील नागरिकांकडून अलिकडे सातत्याने कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या भागातील मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ कनेक्शन झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याविरोधात तातडीने पावले उचलत मनपाने ही प्रभावी कारवाई केली.
महापालिकेने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, अनधिकृत नळ कनेक्शन घेऊ नये. अशा जोडण्यांमुळे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण येतो आणि इतर रहिवाशांना याचा फटका बसतो. यापुढेही अशा अनधिकृत कनेक्शनवर सातत्याने कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?






