पीक कर्जासाठी शिबिरांचे आयोजन करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पीककर्जासाठी शिबिरांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 (डि-24 न्यूज)- खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. पीक कर्जाचे आतापर्यंत 42 टक्केच वाटप झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मागील पीक कर्जाचे नुतनीकरण व्हावयाचे अद्याप बाकी आहे. अशावेळी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बॅंका, कृषी, सहकार व महसूल यंत्रणांनी मिळून गावपातळीवर पीक कर्जासाठी शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्ह्यातील बॅंकांची आज बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे, श्रीमती उषा पवार तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, यंदा सन 2025 साठी जिल्ह्यात 1 लाख 54 हजार 770 खातेदारांना 1596 कोटी 63 लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 630 कोटी 55 लक्ष रुपये इतकेच म्हणजेच 42 टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. याबाबत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप जिल्ह्यातील 1 लाख 87 हजार 912 शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नुतनीकरण व्हावयाचे बाकी आहे. त्यामुळे नव्याने पीक कर्ज देण्यात अडचणी निर्माण होत आहे.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. पीक कर्ज नुतनीकरणाबाबत शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जावी. ज्या गावात ज्या बॅंकेचे खातेदार असतील त्या गावात संबंधित बॅंकेने पीक कर्जासंदर्भात शिबीर आयोजीत करावे. या शिबीरात गावपातळीवरील महसूल, कृषी, जिल्हा उपनिबंधक इ. विभागांचे अधिकारीही सहभागी होतील. त्या गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नुतनीकरण करुन लगेचच त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात पीक कर्ज वितरण पूर्ण होत नाही तोवर बॅंकांसाठी पोलीस बंदोबस्त वा पेट्रोलिंग व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबतही प्रशासन विचार करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






