जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदी पात्र व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम...

 0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदी पात्र व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदी पात्र व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम... 

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून "जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत" या थीमवर आज सुखना नदी पात्र व परिसरात प्लास्टिक जमा करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.

 "जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत" या अंतर्गत

 प्लास्टिक प्रदूषणाबाबत जनजागृती करणे, एकल वापराच्या प्लास्टिकसह प्लास्टिकचा वापराचे प्रमाण कमी करणे व यासाठी शाश्वत पर्याय विकसित करणे या तत्वावर आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जि. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या नियोजनात महानगरपालिकेने "सुखना नदी" चिकलठाणा येथे नदीपात्र व परिसरात संपूर्ण स्वच्छता अभियान राबविले.

सुखना नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मनपा व्यापक व दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहे. उपायुक्त विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली, 20 मार्च 2025 पासून या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, त्याला आता गती मिळाली आहे. दरम्यान 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असल्याने मनपाकडून सुखना नदीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यात मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी सहभागी होऊन नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. यात महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालय 5 व 6 चे सर्व स्वच्छता कर्मचारी-अधिकारी, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी तसेच इतर विभागाचे स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांनी ही मोहीम पूर्णत्वास नेली.

या मोहिमेमध्ये सर्व स्वच्छता कर्मचारी नागरिक यांनी नदीपात्रात वर्षोनुवर्षे पडीत असलेला जवळपास 43 टन सुका कचरा उचलला ज्यात प्रामुख्याने प्लास्टिक, काचेचा बॉटल, कपडे, कागद, थर्माकोल, इ घातक कचरा होता. हा कचरा पुढील प्रक्रियेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकिया केंद्र येथे पाठविण्यात आला. तसेच मातीमिश्रीत कचरा आता पर्यंत 5 ट्रक उचलण्यात आला आहे.

सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत आता पर्यंत नदीचे खोलीकरण, रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. सध्या सुमारे 3 ते 4.5 किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. या कामांसाठी तीन पोकलेन आणि चार जेसीबी यंत्रे सातत्याने कार्यरत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या नियमित देखरेखीखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने हे कार्य वेगाने पुढे सरकत आहे.

नदीच्या दोन्ही काठांवर विविध देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून हरितपट्टा विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि नदीकाठ अधिक सुंदर व सजीव होईल. सुखना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा केवळ नदीचे मूळ स्वरूप पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न नसून, शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे. असेही घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पाटील यांनी सांगितले.

यावेळी पर्यावरण रक्षणाची तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी शपथ घेण्यात आली तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी व प्लास्टिकचा शाश्वत पर्याय बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवसथापन कक्षप्रमुख विजय पाटील यांनी विशेष प्रयत्न घेतले तसेच सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत, सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी, सहाय्यक आयुक्त राहुल जाधव, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, रेड्डी कंपनीचे मुरली रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चिकलठाणा परिसरातील नागरिक, व्यावसायिक, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय 5 व 6 चे सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता जवान, उद्यान विभागाचे कर्मचारी, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी, इ यांच्या उपस्थितीत हे स्वच्छता अभियान पार पडले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow