मनपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यातील युध्दात शहिदांच्या स्मृतींना उजाळा...

मनपाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यातील युद्धात शहिदांच्या स्मृतींना उजाळा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) महानगरपालिकेचे वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या सूचनेनुसार , अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व उप आयुक्त लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 1857 च्या स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्यातील युद्धात शहीद झालेल्या क्रांतिवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे इतिहास तज्ञांचे व्याख्यान व शौर्य गाथेचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ.शेख रमझान ,डॉ.बिना सैगर, श्री असलम मिर्झा या इतिहास तज्ञांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ.शेख रमझान ,डॉ.बिना सैगर, श्री असलम मिर्झा ,उप आयुक्त तथा विभाग प्रमुख लाखिचंद चव्हाण, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू आदींची उपस्थिती होती.
डॉ.शेख रमझान यांनी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) शहरात 23 जून 1857 रोजी भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाईची सुरुवात आणि त्यात शाहिद झालेल्या क्रांतिवीर यांच्या बलिदानाची माहिती दिली. तसेच डॉ.बिना सैगर, श्री.असलम मिर्झा यांनीही स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला.
दक्षिण भारतात 23 जून 1857 रोजी शहराच्या खाम नदीवरील छावणी लोखंडी पुलाजवळ भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई सुरू झाली होती. या लढ्यातील हिंदी सैनिकांना ,क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देऊन शहीद केले होते. या ऐतिहासिक दिनाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मनपाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अंजली देशपांडे, सुभाष खिल्लारे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व राज्य गीताने झाली.
What's Your Reaction?






