मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मौलाना गुलाम वस्तानवी यांचे दु:खद निधन...!

 0
मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मौलाना गुलाम वस्तानवी यांचे दु:खद निधन...!

मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मौलाना गुलाम वस्तानवी यांचे निधन, मुस्लिम समाजासाठी मोठा धक्का...

अक्कलकुवा, दि.4(डि-24 न्यूज) प्रख्यात शिक्षातज्ञ आणि धार्मिक नेतृत्व लाभलेले शिक्षणमहर्षी हजरत मौलाना गुलाम वस्तानवी यांच्या निधनाची बातमी ऐकताच धक्का बसला. हि बातमी संपूर्ण समाजासाठी अत्यंत दु:खद आणि काळजाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने समाजाच्या शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक उन्नतीला दिशा देणारा दीपच जणू विझला आहे. मुस्लिम समाजाच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या व शेवटच्या श्वासापर्यंत मुस्लिम धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी झटले. 

मौलाना वस्तानवी हे जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम, अक्कलकुवा या देशभर प्रसिद्ध असलेल्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी एकाच वेळी इस्लामिक शिक्षण आणि आधुनिक ज्ञानाचा सुरेख संगम साधणाऱ्या संस्था उभारून मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या नव्या पर्वाकडे नेले.

अक्कलकुवा पुरतेच नव्हे, तर देशभरात त्यांनी अशा संस्था स्थापल्या, ज्या आजही हजारो विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाचे उत्तम दालन खुलं करत आहेत. विविध धर्माचे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक संस्थेत सध्या शिक्षण घेत आहेत. मागिल काही दिवसांपासून त्यांची तब्येत जास्त खालावली होती. त्यांच्यासाठी देशभर दुवा केली जात होती परंतु त्यांची आज प्राणज्योत मावळली.

मौलाना साहेब हे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील ‘नूर हॉस्पिटल’चे संस्थापकही होते. येथे विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. अल्पदरात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देणारे हे रुग्णालय गरीब आणि गरजूंसाठी आशेचा किरण ठरले आहे. कुंजखेडा येथील शैक्षणिक कॅम्पस मोठे नावाजलेले आहे.

त्यांच्या कार्यशक्ती, दूरदृष्टी, सामाजिक भान आणि प्रामाणिक कष्टांमुळे मुस्लिम समाजात नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी समाजाला शिक्षण, आरोग्य आणि आत्मभानाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवला.

त्यांचे जाणे ही केवळ व्यक्तीची हानी नसून, एक प्रेरणादायी युगाचा अस्त आहे. त्यांच्या आठवणी आणि कार्य समाजाला प्रेरणा देत राहतील.

अत्यविधीची माहिती:

हजरत मौलाना गुलाम वस्तानवी यांचा अंत्यविधी आज रात्री 12.30 वाजता अक्कलकुवा येथे त्यांच्या निवासस्थानी इस्लामिक परंपरेनुसार पार पडणार आहे. देशभरातून शिष्य, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी अक्कलकुवा येथे जमले आहे. यावेळी मोठा जनसमुदाय जमण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow