शहराचे आधुनिक निर्माते मलिक अंबर यांच्या स्मर्णार्थ कार्यक्रम, टाऊन हाॅलमध्ये स्मारक म्युझियमची मागणी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे मलिक अंबर यांच्या 399 व्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. यानिमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात पुढील वर्षी त्यांच्या 400 व्या स्मृतिदिनी भव्य 'जश्ने मलिक अंबर' आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सिल्कमिल कॉलनी येथे झालेल्या या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक, विद्यार्थी, नागरिक, वकील आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. उपस्थितांनी मलिक अंबर यांच्या दूरदृष्टीचे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे कौतुक केले. त्यांनी निर्माण केलेली 'नहर ए अंबरी' आणि त्यांच्या बांधकाम शैली आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना अनेकांनी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील टाऊन हॉलला मलिक अंबर स्मारक म्युझियममध्ये रूपांतरित करण्याची मागणी केली, जेणेकरून त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढ्यांना मिळत राहील.
बाळासाहेब गरुड यांनी सांगितले कि सध्याच्या काळात नविन पीढ़ी समोर मलिक अंबरचे कार्य विविध भाषेतून मांडले पाहिजे.
मलिक अंबर यांचे 16 वे वंशज ॲड. अत्ताऊरहमान अंबरी यांनी सांगितले की, मलिक अंबर यांनी खडकी शहराची स्थापना केली आणि आता या शहराला त्यांच्या 'नहर का पाणी शहर तक' या संकल्पनेतून पाणी पुरवठा करणे ही काळाची गरज आहे. शहराच्या 30 ते 40 टक्के भागाला नहरीचे पाणी पुरवण्याची क्षमता असून, मनपाच्या पाणीपुरवठा योजनेत याचा समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी खुलताबाद येथे त्यांच्या मजार परिसरात अधिक मोठ्या स्तरावर 'जश्ने मलिक अंबर' आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इतिहास अभ्यासक डॉ. शेख एजाज मुन्शीमिया यांनी मलिक अंबर यांच्या शेतकरी कल्याण योजना आणि जल व्यवस्थापनावर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मलिक अंबर यांच्या काळात खडकी शहरात बारमाही शुद्ध पाणी उपलब्ध होते. माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी शहराच्या विकासात मलिक अंबर यांच्या योगदानाला उजाळा दिला.
प्रा. अब्दुला चाऊस यांनी मलिक अंबर यांच्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाचे उदाहरण देताना सांगितले की, त्यांनी विविध धर्मीयांसाठी सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. ते एक न्यायप्रिय आणि लोकांच्या समस्या ऐकणारे शासक होते, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. अत्ताऊरहमान अंबरी यांनी लवकरच मलिक अंबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा व्यक्त केली आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्झा कय्युम नदवी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मलिक अंबर यांच्या कार्याची महती आणि त्यांच्या स्मरणार्थ करावयाच्या भावी योजनांवर सकारात्मक चर्चा झाली, जी निश्चितच शहराच्या इतिहासाला एक नवी दिशा देणारी ठरेल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड जुबेर अंबरी यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






