इम्तियाज जलिल पोहोचले मुकुंदवाडीत, मनपा व पोलिस प्रशासनाला दिली चेतावणी...

इम्तियाज जलिल पोहोचले मुकुंदवाडीत, मनपा व पोलिस प्रशासनाला दिली चेतावणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) शहरातील पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारीच गुंडासारखे वागू लागले आहेत. अतिक्रमण काढण्याची ही कुठली पद्धत. नोटीस नाही, सूचना नाही आणि थेट गरीबांच्या घरावर व दुकानांवर बुलडोझर फिरवला. पावसाळ्यात अतिक्रमित घरांवर कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. ते देखील एका सत्ताधारी आमदाराच्या फोनवरून पोलिस आणि प्रशासनाने पायदळी तुडवले. तुम्ही नियमाप्रमाणे काम करणार की मग नेत्याच्या मनाप्रमाणे..? कायदा तुम्हीच मोडत असतील तर हि न्यायालयाची अवमानना नाही का...? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केला.
निराला बाजार, पैठण गेट, शहागंज मध्ये अतिक्रमण दिसत नाही का...? मोठमोठ्या इमारतींनी पार्कींग गायब केले त्यांच्यावर कार्यवाही करण्यास प्रशासन का घाबरत आहे. अवैध धंदे कोठे सुरु आहे पत्त्यांचे क्लब कोठे सुरु आहे मला माहित आहे त्या अवैध धंद्यांवर कार्यवाही का होत नाही असा प्रश्न त्यांनी मुकुंदवाडीत भेट देताना उपस्थित केला.
मुकुंदवाडी भागात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यात शेकडो घरे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात या भागातील लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. आज एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या भागाला भेट देत तेथील नागरीक आणि छोटे मोठे व्यापारी, दुकानदारांशी चर्चा केली. भाजपा आमदाराने एक फोन केला आणि सगळं जमीनदोस्त करून टाका, असे फर्मान सोडले आणि ही कारवाई करण्यात आली, असा आरोप इम्तियाज यांनी केला.
नियम पाळून कारवाई झाली असती तर आमच काही म्हणणं नव्हत, अतिक्रमण पावसाळ्यात काढता येत नाही असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. पण आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालो का...? तुम्ही नियम पाळा आम्ही नियम पाळतो. भाजपच्या नेत्याने एका अधिकाऱ्याला सांगितले सगळ जमीनदोस्त करून टाका मग प्रशासन नियमाप्रमाणे काम करणार ? की नेत्यांच्या मनाप्रमाणे काम करणार..? एक नेता म्हणतो एफआयआर करा, दुसरा म्हणतो सगळ पडून टाका,नियम तुमच्यासाठी नाही का...? गरीबांना का वेठीस धरता. एका युवकाचा खून झाला त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहीजे. अशी आमची मागणी आहे.
जाधवमंडीमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू आहे. ही कारवाई केली तशी तिथे करू शकता का..? मात्र तिथे मोठे नेते आहेत म्हणून कारवाई होत नाही. त्यांना नोटीस देता मग इथल्या लोकांना नोटीस द्यायला पाहजे होती, असेही इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला. या निमित्ताने माझा महानगरपालिकेला प्रश्न आहे पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत पार्किंग कुठे आहे...? तिथे बेकायदा दुकाने थाटली गेली आहेत. तशीच परिस्थिती शहागंज ते सिटी चौकपर्यंत दिसते. मग फक्त गोरगरीब लोक राहतात तिथेच कारवाई होते का...? निवडणुक काळात मते मागायला येणाऱ्या नेत्या आता इथे यायला वेळ नाही. चार महीन्यानंतर तेच नेते मतांची भीक मागायला येतील त्यांना धडा शिकवा अशी टीकाही इम्तियाज यांनी केली.
या अतिक्रमणाच्या कारवाईत राजकारण केले जात आहे. एका आमदाराने सांगितले तर सगळा पाडून टाकता. मग मनपा, आयुक्तलय, पोलीस स्टेशन सगळ बंद करून नेत्यांच्या कार्यालयात जाऊन बसा, तुम्ही त्यांचेच ऐका, असा संताप त्यांनी व्यक्त केला. ज्या मुलाची हत्या झाली त्याचा आम्ही निषेध करतो. ज्याने हत्या केली त्याच्यावर कारवाई करा मात्र इतक लोकांना त्रास का देता...? सुप्रीम कोर्टाने योगी सरकारवर ताशेर ओढले आहे. कोर्ट म्हणले लोकशाहीमध्ये बुलडोजर कल्चर चालणार नाही. गुंडांची दादागिरी बघितली आता पोलिस आणि प्रशासनाची दादागिरी या शहरात दिसत आहे. असे ते म्हणाले.
यावेळी बाळासाहेब दांडगे, कुणाल खरात, काकासाहेब काकडे, नासेर सिद्दीकी, समीर साजिद बिल्डर, जमीर अहेमद कादरी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






