बारावी परीक्षा काॅपी प्रकरण भोवले, 18 शिक्षक व कर्मचारी निलंबित, शिक्षण विभागात खळबळ...
बारावी परीक्षा काॅपी प्रकरण भोवले, 18 शिक्षक व कर्मचारी निलंबित, शिक्षण विभागात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) -
सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहे. कन्नड तालुक्यात या परिक्षेत सामुहिक काॅपी प्रकरण सिसिटीवीत कैद झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करुन तात्काळ शिक्षण विभागाने 18 शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
दक्षता समितीच्या आदेशानुसार बोर्ड परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी 18 जण निलंबित
परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी शिक्षण विभागाची ठोस कारवाई
दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर श्री अंकित आणि विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल साबळे यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान घडलेल्या गैरप्रकार प्रकरणी तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जेवपूर, ता. कन्नड येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. छत्रपती संभाजीनगर, श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशानुसार सखोल चौकशी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तसेच अधिकृत अहवालांच्या आधारे संबंधित परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या काही शिक्षक व सेवक यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीअंती सेवा नियमांनुसार पुढील 18 जणांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे :
या कार्यवाहीत निर्मळ भगवान नथू, सातदिवे सचिन रामदास,
नरेश भागिनाथ सोनवणे,
श्रीमती छाया नरसिंग मुंगे,
बळीराम कचरू राठोड,
श्री आर. के. डरे,
संतोष रावसाहेब लिहिणार,
अनंता बळवंत गाढेकर,
करणसिंग हुमुकसिंग चंदवाडे,
दीपक कैलास सोनवणे,
बाळकृष्ण श्रावण साळवे,
संजय कारभारी कडवे,
संतोष पंढरीनाथ भिंगारे,
संजय धर्मराज दाभाडे,
पी. सी. आव्हाळे,
ऋषिकेश वसंतराव पाटील,
राधा एकनाथ पेरे,
एस. टी. घुगे (सेवक)
निलंबन आदेशानुसार संबंधित कर्मचारी निलंबन कालावधीत मुख्यालय सोडू शकणार नाहीत. त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा इतर सेवा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांनी स्पष्ट केले आहे की परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, शिस्त आणि प्रामाणिकता अबाधित ठेवणे ही विभागाची सर्वोच्च जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारास कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.
खाजगी संस्थांमधील संबंधित कर्मचाऱ्यांवरही नियमांनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परीक्षा नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?