यापुढे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला तर भाजपच्या एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही - मनोज जरांगे पाटील
यापुढे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला तर भाजप नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही - मनोज जरांगे पाटील
नवी दिल्ली, दि.22(डि-24 न्यूज) - सरकार प्रत्येकवेळी गोरगरीबांच्या लेकरांवर जाणून बुजून अन्याय करत आहे. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयोग झाला तर देशात आणि महाराष्ट्रात भाजपच्या एकाही नेत्याला फिरू देणार नाही असता इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जंतरमंतरवरुन दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नीट परीक्षा घोटाळ्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे आज दुपारी पोहचले. आज मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून जरांगे पाटील नवी दिल्लीला रवाना झाले.
दुपारी त्यांनी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी एवढेच सांगायला आलो आहे. आम्ही सगळे आणि संपूर्ण देश तुमच्या सोबत आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय कोणीही मागे हटणार नाही.
यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की मला हिंदी येत नाही, मी मराठीतून तुमच्याशी संवाद साधणार आहे. त्यांना यावेळी उपस्थितांनी हिंदीतून बोलण्याचा आग्रह केला. जरांगे पाटील म्हणाले, माझी हिंदी ऐकली तर तुम्ही तुमची हिंदी विसरून जाल. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अभिजित दिपके यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठीतून व्यक्त केलेल्या भावना उपस्थितांना हिंदीमध्ये भाषांतरीत करून सांगितल्या.
जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला. तसाच लाठीचार्ज आणि गोळीबार हा आमच्यावरही अंतरवालीमध्ये झाला होता. आमच्याही आया-बहिणींना मारहाण झाली होती. गोळीबार झाला होता.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे. तुम्ही ही जागा सोडून जाऊ नका, सगळा देश तुमच्याा मागे आहे. दुसरीकडे गेलात तर तुमचे आंदोलन मोडून काढले जाईल. शांततेने आंदोलनात काय ताकद आहे ती आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, फक्त जागा सोडू नका.
जरांगे म्हणाले, सरकारला आपण निवडून दिले आहे, आपल्या आई-वडिलांनी, तालुक्याने, जिल्ह्याने आणि गोरगरीब जनतेने या सरकारला मतदान केले आहे. आता हेच आपल्या विद्यार्थ्यांवर आणि लेकरा-बाळांवर उठले आहेत. त्यांना उलटे करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि या देशातील गोरगरीब जनतेत आहे. यापुढच्या काळात तुम्हांला धक्का लागला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, सोनमजींसोबत आहोत, अभिजित दिपकेंसोबत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?