अगोदर पाकिस्तानवर हल्ला नंतर माॅकड्रील...!

दहशतवादी हल्ल्याचे रेल्वेस्टेशनवर मॉकड्रील...
अग्निशमन दलासह विविध विभागांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)
जम्मू कश्मिर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशतवादा विरोधात भारताने पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवाद्यांचा अड्डा भारताने हवाई हल्ले करीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वेस्टेशन दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कसा बचाव करावा याचे मॉकड्रील करण्यात आले.
पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून पाकिस्तानविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तसेच पाकिस्तानवर हल्ला करुन पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी भारतीय नागरिकांतून करण्यात येत होती. तसेच गेल्या आठ ते दहा दिवसापासून युध्दाची तयारी सुरु असल्याने कधीही युध्द सुरु होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. हे सर्व सुरु असतांनाच भारताने पाकव्याप्त कश्मिरमधील 9 दहशतवादी तळावर हवाई हल्ले करीत ते बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानकडून प्रत्युत्तर म्हणून भारतावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान रेल्वेस्टेशनवर मॉकड्रील करण्यात आले.
रेल्वेस्टेशनवर करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये मनपा अग्निशमन विभाग, पोलिस प्रशासन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलिसांचे क्युआरटी कमांडो पथक आदी सहभागी झाले होते. प्रशासनाचे मॉकड्रील पाहण्यासाठी रेल्वेस्टेशनवर गर्दी झाली होती. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ.भागवत कराड, आ. संजय केणेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर आदींची रेल्वेस्टेशनवर उपस्थिती होती. यावेळी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एकमेकांचा बचाव कसा करावा याचे प्रात्याक्षिक करण्यात आले. तसेच रेल्वेस्थानकात शिरलेल्या दहशतवाद्यांचा क्युआरटी कमांडो पथकाने खात्मा केल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.
What's Your Reaction?






