तापत्या उन्हात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर...!

 0
तापत्या उन्हात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर...!

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा...

 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा...तापत्या उन्हात काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) राज्य सरकारच्या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने, तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा, शहागंज येथून प्रारंभ होऊन चेलीपुरा मार्गे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मागण्या

शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष आहे. शेतकरी कर्जमाफी तातडीने जाहीर करावी, दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना करावी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, तसेच पीक विम्याचा लाभ त्वरित मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच "मागेल त्याला सौर कृषी पंप" योजना तातडीने लागू करावी, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा आणि ठिबक सिंचनासह विविध कृषी अनुदान योजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

वीजपुरवठा आणि दुधाला हमीभाव यासंदर्भात ठोस मागण्या

ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी आणि थकबाकी वीजबील माफ करावे, अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय, दुधाला किमान ₹40 प्रति लिटर हमीभाव मिळावा, दूध उत्पादकांना वेळेवर अनुदान मिळावे आणि पशुखाद्यावर अनुदान द्यावे, अशा मागण्यांचा समावेश होता.

महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐरणीवर

महिलांसाठी जाहीर केलेली लाडकी बहिण योजना कोणत्याही अटींशिवाय लागू करावी आणि दरमहा ₹2,100 मदत नियमित मिळावी, अशा मागण्यांसह घरकुल योजना, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच केसरी रेशन कार्डधारकांना पुन्हा रेशन मिळावे आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, असा आग्रह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने धरला.

शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात काँग्रेसचे नेते खासदार डॉ. कल्याण काळे, अनिल पटेल, नामदेव पवार, विलास औताडे, प्रकाश मुगदीया, किरण डोणगांवकर आदी पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावीत, अन्यथा लवकरच अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

मोर्च्याचा वेळ व समारोप

हा आंदोलन मोर्चा सोमवार, दिनांक 3 मार्च 2025 रोजी सकाळी 12 वाजता सुरू झाला आणि दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

शासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील, असे काँग्रेसने ठणकावून सांगितले.

या प्रसगी माजी मंत्री अनिल पटेल माजी आ. नामदेवराव पवार, प्रकाश मुगदीया, रवींद्र काळे , विलास औताडे, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे,भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत मोहन देशमुख, जितेंद्र देहाडे, विश्वास औताडे, तालुकाध्यक्ष भास्कर घायावट, संदीप बोरसे, अनिल श्रीखंडे, विनोद तांबे, सर्जेराव चव्हाण, संतोष शेजूळ, राजू काळे, गणेश शिंदे, निमेश पटेल, शेख फिरोज, मुदस्सर पटेल, दिक्षा पवार, दीपाली मिसाळ, रेखा वाहटुळे, अनिता भंडारी, राजेंद्र जगदाळे, सुदाम मते, संतोष मेटे, कचरू मैद, पुंडलिक जंगले, गजानन मते, मनोज सेजुळ सुरेश शिंदे अतिश पितळे, मोहित जाधव, पप्पुरज ठुबे, अशोक डोळस, सर्व आघाडी व सेलचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी व शेतकरी बांधव

उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow