पी.एम.किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे...!
पी.एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 30 जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावे
छत्रपती संभाजीनगर , दि.10(डि-24 न्यूज) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिली जाते. या योजनेतील लाभ केवळ पात्र आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे.
पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असून, अन्यथा आगामी हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासनाच्या निर्देशानुसार 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
लाभार्थी शेतकरी आपल्या जवळच्या सामाईक सेवा केंद्रात (CSC) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा पी.एम. किसान मोबाईल ॲपवरील फेस ऑथेंटिकेशन सुविधेच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या दोन्ही पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून प्रमाणीकरण करता येणार आहे.
ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) आणि क्षेत्रीय कर्मचारी यांच्या सहकार्याने गावागावात पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना मोबाईल वापरण्यात किंवा तांत्रिक प्रक्रियेत अडचणी येत आहेत, त्यांनी ग्रामस्तरीय नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.
ई-केवायसीच्या अभावी कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?