रमाई आवास योजनेच्या पहिल्या हप्त्यात वाढ, आता लाभार्थ्यांना मिळणार 50 हजार - पालकमंत्री संजय शिरसाट
रमाई आवास योजनेच्या पहिल्या हप्त्यात वाढ; आता लाभार्थ्यांना मिळणार ₹50 हजार – पालकमंत्री संजय शिरसाट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 30(डि-24 न्यूज)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लाभांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. घरबांधणीसाठी पहिल्या टप्प्यात दिला जाणारा ₹25 हजारांचा हप्ता वाढवून ₹50 हजार करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. केवळ ₹25 हजारांत घरबांधणीची सुरुवात करणे लाभार्थ्यांसाठी कठीण असल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रमाई आवास योजनेतील काही अडचणींमुळे लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे लाभार्थ्यांची यादी सभागृहाबाहेर लावण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासनाने त्याची तत्काळ अंमलबजावणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच योजनेच्या कामाला अधिक गती देण्यासाठी दर महिन्याच्या 1 तारखेला लाभार्थ्यांची अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजकल्याण विभागाचे अधिकारीदेखील यापुढे महानगरपालिकेशी समन्वय साधून काम करतील, असेही त्यांनी नमूद केले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर कोणत्याही घरकुल योजनेत मागे राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ वितरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल त्यांनी महापौर, पदाधिकारी आणि आयुक्त यांचे अभिनंदन केले.
महापौर समीर राजूरकर यांनी आपल्या भाषणात रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. ही समिती लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, योजनेचे टप्पे आणि प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच घरबांधणीचे काम सुरू होताच दुसरा हप्ता तातडीने मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात रमाई आवास योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका व प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित लाभार्थी व मान्यवरांना योजनेची कार्यपद्धती आणि विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक त्र्यंबक तुपे, नगरसेविका हर्षदा शिरसाट, कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व कल्पिता पिंपळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थि
त होते.
What's Your Reaction?