"मतदान करत नाही असला दादला नको गं बाई"... विद्यार्थ्यांनी केली भारुडातून जनजागृती

 0
"मतदान करत नाही असला दादला नको गं बाई"... विद्यार्थ्यांनी केली भारुडातून जनजागृती

‘मतदान करत नाही.... असला दादला नको गं बाई’...

विद्यार्थ्यांनी केली भारुडातून जनजागृती....

योग्य प्रतिनिधीत्वासाठी मतदानाचा टक्का वाढणे

आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) दादला नको गं बाई… मला दादला नको गं बाई’,

ह्याच्याकडे मतदान कार्डच नाही, मला दादला नको गं बाई,

हा मतदानाला जातच नाही, असला दादला नको गं बाई,

मतदानाच्या सुट्टीला हा गावाला जाई, असला दादला नको गं बाई!

‘गुढी पाडवा- मतदान वाढवा’ या स्वीप उपक्रमाअंतर्गत बजाजनगर येथील हायटेक इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीनाथ फार्मसीच्या अनिकेत भालेराव आणि ऋषिकेश गवाले या विद्यार्थ्यांच्या जोडगोळीने सादर केलेले भारुड उपस्थितांना हसवत हसवत मतदानासाठी संकल्पित करुन गेले.

संत एकनाथांच्या भारुडाचे गारुड आजही जनमानसावर आहे, ह्याची ही प्रचिती. 

 बजाजनगर येथील हायटेक इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आज १०८ औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदार संघाचा स्वीप उपक्रम आज ‘गुढी पाडवा मतदान वाढवा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी , उपजिल्हाधिकारी रोहयो तथा सहा. निवडणूक अधिकारी अर्चना खेतमाळीस, उपजिल्हाधिकारी रामदास दौड, गायिका श्रावणी महाजन, भारतीय ग्रामिण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, आनंद जाधव, प्राचार्य गोविंद ढगेआदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नवमतदार, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालकही उपस्थित होते. पथनाट्य, नृत्य, गीतगायन या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. तसेच भारुड विद्यार्थ्यांच्या जोडगोळीने सादर केले. त्यांना सुयश यादव, शालिनी कदम, अंकिता जाधव, अनूजा जाधव, हर्षदा जगताप या त्यांच्या विद्यार्थी- विद्यार्थिनी मित्रांनी साथ व उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. श्रावणी महाजन यांनीही दोन गिते सादर केली. 

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, मतदानाची टक्केवारी कमी असली म्हणजे आपल्याला नेमके योग्य प्रतिनिधीत्व मिळते की नाही ? हा प्रश्न निर्माण होतो. जास्त मतदान झाले तर अधिक लोकांच्या मताने लोकप्रतिनिधी निवडला जातो ही निवड अधिक योग्य असते. त्यामुळे योग्य प्रतिनिधीत्वासाठी मतदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे,असे स्वामी यांनी सांगितले.

 सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस यांनीही उपस्थित नवमतदारांशी संवाद साधला. सूत्रसंचालन डॉ. कैलास अतक

रे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow