संविधानामुळे सामान्य माणसाचाही सर्वांगिण विकास होतो - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
"मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा, जागर संविधानाचा" कार्यक्रम...
संविधानामुळे सामान्य माणसाचाही सर्वांगीण विकास होतो_ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ,दि.16 (डि-24 न्यूज) - संविधानामध्ये मोठी ताकद आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क आणि कर्तव्य संविधानाने बहाल केले आहेत, संविधानानुसार सामान्यातला सामान्य माणूसही
सशक्त आणि विकसित होतो, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने तापडिया नाट्यगृह येथे "मुक्ती संग्राम मराठवाड्याचा, जागर संविधानाचा "या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शिरसाठ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनंत राऊत, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र हरपाळकर ,अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, माजी महापौर नंदकुमार घोडेले , विकास जैन, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, जात पडताळणीच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे , बार्टीच्या व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी सोनवणे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री संजय शिरसाट पुढे म्हणाले ,मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास तरुण पिढीने समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संविधानाची व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन जीवनामध्ये सशक्त बनले पाहिजे.
माझ्यासारखा सामान्य माणूस संविधानाच्या ताकदिने मंत्री पदापर्यंत पोहोचू शकला, अशी किमया संविधानात आहे. असे ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. जे विद्यार्थी संविधानाचे सर्व कलमे पाठ करतील त्यांना एक लाख रुपयाचे बक्षीस बार्टीमार्फत दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनीही आपले विचार मांडले. व्याख्याते डॉ.अनंत राऊत यांनी देशांमध्ये संविधान संस्कृती रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. बार्टी सातत्याने संविधानाचा जागर करते ही भूषणवह बाब असल्याचे ते म्हणाले. रवींद्र जोगदंड यांनीही राष्ट्रीय विकासात संविधानाचे महत्त्व विशद करून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास मांडला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले. यावेळी काही विद्यार्थ्यांना राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवड्या निमित्त जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरणही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध लोकशाहीर कुणाल वराळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीत व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करून झाली संविधान, या कार्यक्रमाला
विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, बार्टीचे समतादूत अधिकारी,कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
What's Your Reaction?