औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा...!

 0
औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा...!

योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️औरंगाबाद पाणीपुरवठा योजना आढावा बैठक

मुंबई, दि.15(डि-24 न्यूज)- औरंगाबाद वासियांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम गतीने पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी याबाबत आयोजित बैठकीत दिले.

बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.

 

कंत्राटदाराने व संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनेची अर्धवट झालेली कामे कंत्राटदाराकरवी तातडीने पूर्ण करून घ्यावीत. पाण्याच्या टाकीची बांधकामे पूर्ण करण्यात यावीत. शहरातील वितरण प्रणालीचे कामही पूर्णत्वास न्यावे. अर्धवट कामांमुळे शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नाही. या योजनेच्या कामासाठी संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून सद्यस्थितीबाबत कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. शेवटच्या शहरवासीयाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यानुसार महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करून योजना पूर्णत्वास न्यावी. शहरातील नळ जोडण्या देण्याचे प्रमाण वाढवावे. कंत्राटदाराच्या कामाचे मूल्यांकन करून वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा. संबंधित कंत्राटदाराकडून पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे 'हायड्रोलिक टेस्टिंग' पूर्ण करावे.

 कंत्राटदाराने योजनेचे विहित कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. योजनेच्या कामाचे नियोजित टप्पेनिहाय आराखडा बनवून याबाबत पुढील बैठकीत सादरीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचे कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावे. रिस्टोरेशनचे कार्य गतीने पूर्ण करून खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 

बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सादरीकरण केले. बैठकीस महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव (नगर विकास) के. गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडगे, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सहभाग घेतला.

थोडक्यात पाणीपुरवठा योजना ...

 शहराच्या 2052 मध्ये असणाऱ्या लोकसंख्येला 604 एमएलडी (मिलियन लिटर पर डे) एवढा पाणीपुरवठा गृहीत धरून जायकवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाणी वितरणासाठी शहरात 59 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार त्यापैकी 29 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात 1911 किलोमीटर पाणी पुरवठा वितरण प्रणालीपैकी 1291 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ४६ हजार ५०० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow